डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतात बहुजन समाजात सर्वाधिक उपेक्षित असा एक वर्ग होता. तो म्हणजे पूर्वापार अस्पृश्य मानल्या गेलेल्या दुर्दैवी लोकांचा वर्ग होय. या समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत होता. माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही त्यांच्याकडून हिरावून घेतला गेला होता. याच उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी, या वर्गाचा उद्धार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन समर्पित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू या गावी झाला. भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे संपूर्ण नाव. त्यांचा जन्म महार या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत झाल्यामुळे लहानपणापासून त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु या सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण दापोली, सातारा आणि मुंबई अशा विविध ठिकाणी झाले. इ.स. 1907 मध्ये मुंबई च्या एल्फिन्स्टन हायस्कूल मधून ते मॅट्रिक पास झाले. पुढे मुंबई मध्येच त्यांनी B.A. ची पदवी पूर्ण केली. 1913 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले. यासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी M.A. आणि पी.एचडी या पदव्या मिळवल्या. 1920 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी तेथे अर्थशास्त्रात बीएससी ची पदवी मिळवली. पुढे ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधबद्दल इंग्लंड विद्यापीठाने त्यांना डीएससी ही पदवी बहाल केली. तसेच इंग्लंड मध्ये ते बॅरिस्टर देखील झाले.
दलित समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी आणि दलित समाजाच्या प्रगतीसाठी 20 जुलै 1924 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकरिणी सभा’ या संस्थेची स्थापना केली. तत्पूर्वी 1920 मध्ये त्यांनी ‘मुकनायक’ नावाचे पाक्षिक सुरू केले होते.
हिंदू धर्माने अस्पृश्यांवर अनेक बंधने लादली होती. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यावर देखील बंधने होती. यालाच विरोध म्हणून 20 मार्च 1927 साली डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. ‘मनुस्मृती’ या धर्मग्रंथामध्ये अस्पृश्यांवर अनेक निर्बंध लादणार्या प्रथांचे समर्थन केले होते. यामुळेच 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी महाड येथे भरलेल्या एका परिषदेत मनुस्मृतीचे दहन केले. अनेक मंदिरात अस्पृशांना प्रवेश नव्हता 3 मार्च 1930 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून अस्पृशांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्याची सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. 17 ऑगस्ट 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधन ‘रेम्से मॅक्डोनाल्ड’ यांनी ‘जातीय निवाडा’ जाहीर करून आंबेडकरांची ही मागणी मान्य केली होती. महात्मा गांधीचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध होता. स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे जातीय निवाड्याच्या या तरतुदींच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले. या प्रसंगी गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून आंबेडकरांनी तडजोड केली. त्यानुसार 24 आणि 25 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक करार घडून आला. हा करार म्हणजेच ‘पुणे करार’ होय. या करारानुसार आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला. व अस्पृश्यांसाठी कायदेमंडळात राखीव जागा असाव्यात असे या करारात ठरवण्यात आले.
पुढे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायानंसोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.