महात्मा जोतिबा फुले
महाराष्ट्रातील बहुजन समाजात जागृती निर्माण करून बहुजन समाजाला न्याय्य हक्कासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारा ‘पहिला महापुरुष’ म्हणून महात्मा जोतिबा फुले यांचा उल्लेख करावा लागेल. महात्मा फुले हे केवळ एक व्यक्ति नव्हते तर सामाजिक आणि संस्कृतिक परिवर्तनाचा तो एक महान विचार होता.
महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. महात्मा फुले यांना शाळेत जाण्याचा आणि इंग्रजी शिक्षण घेण्याचा योग आला. यातून त्यांची भावी जीवनाची दिशा निश्चित होण्यास मदत झाली. आपल्या आजूबाजूच्या परिसराचे ते उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करू शकले. त्यांच्या लक्षात आले होते की भारतीय समाजात अनेक वर्ग पडलेले आहेत. या वर्गातील वरिष्ठ जातीतील लोकं कनिष्ठ जातीतील लोकांवर वर्षानुवर्षे अन्याय करत आलेले आहेत. धर्माच्या नावावर अनेक अमानुष प्रकार होत होते. स्त्रियांनाही अनेक बंधनांना सामोरे जावे लागत होते. शिक्षणाचा अधिकार सर्वांना समान नव्हता.
महात्मा फुलेंचे असे मत होते की, भारतीय समाजात अन्यायाला बळी पडलेले दोन गट आहेत. ते म्हणजे या समाजातील स्त्रिया आणि अस्पृश्य वर्ग. या दोन्ही गटांच्या उन्नतीसाठी महात्मा जोतिबा फुले यांनी आयुष्यभर काम केले.
महात्मा फुले यांनी आपल्या शेतकर्यांचा आसूड या पुस्तकात लिहिले आहे की,
विध्येविना मती गेली | मातीविना नीती गेली ||
नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले ||
वित्तविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||
म्हणजे शिक्षण नसल्यामुळे काय काय घडेल याचे जीवंत आणि बोलके उदाहरण त्यांनी आपल्या लेखनातून समाजापुढे ठेवले. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा पाया आहे. हे त्यांनी जाणले होते. म्हणून त्यांनी इ. स. 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पुढे 1852 मध्ये पुण्यातील वेताळ पेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी दोन शाळा उघडल्या.
फुलेंनी अस्पृश्यांसाठी फक्त शाळाच नाही उघडल्या तर त्यांची सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रयत्न देखील केले. उन्हाळ्यात अस्पृश्यांचे पाण्याविणा खूप हाल होत होते म्हणून त्यांनी 1868 मध्ये आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. अस्पृश्यांना संघटित करण्यासाठी आणि त्यांना जागृत करण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 साली ‘सत्यशोधक समजा’ची स्थापना केली.
फुलेंचा विषमता, अन्याय आणि शोषण यांवर आधारित समाजव्यवस्थेला विरोध होता. यासंबंधी आपली भूमिका आणि विचार आपल्या लेखनातून महात्मा फुले यांनी समाजासमोर मांडले. ‘शेतकर्यांचा आसूड’, ‘गुलामगिरी’, ‘ब्राम्हणाचे कसब’, ‘अस्पृश्यांची कैफियत’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारखे ग्रंथ त्यांनी लिहिले.